Tuesday, July 27, 2010

लिजा रे.

लिजा रे.
-------------

        साधारण ९६-९७ च्या आसपासचा काळ. पिवळसर तपकिरी पसरलेलं वाळवंट...तेथील घरांचे 
अर्धवट अवशेष समोर दिसू लागतात. त्या वाळवंटातच राजस्थानी पेहरावात बसलेले वादक वादन सुरु 
करतात आणि उस्ताद नुसरत फतेह आली खान यांचे सुफी सूर त्या पार्श्वभूमीवर ऐकू येऊ लागतात. 
जसजसं गाणं पुढे सरकू लागतं तेव्हा परी किंवा अप्सरा यांच्या वाचलेल्या वर्णनासारखीच सुंदर स्त्री त्या  
वाळवंटात चालताना दिसू लागते. डोक्यावर बांधलेल्या लाल कपड्यात केस आणि अर्धं कपाळ झाकलेले , 
अंगाभोवती लपेटलेली लाल-पिवळी साडी आणि दूरवर वाऱ्यावर उडणारा तिचा पदर. आणि मग तिच्या 
सौंदर्याला साजेसंच ..जणू फक्त तिच्याचसाठी लिहिलेलं गाणं सुरु राहतं......   

हुस्न ए जाना कि तारीफ मुमकिन नही  
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन् 
तू भी देखे अगर तो कहे हमनशीन्  
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन्
  
ऐसा देखा नही खुबसुरत कोई
जिस्म जैसे अजंता कि मुरत कोई 
जिस्म जैसे निगाहो पे जादू कोई
जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई 
जिस्म जैसे मचलती हुई रागनी 
जिस्म जैसे मेहेकती हुई चांदनी                    
जिस्म जैसे के खिलता हुआ इक चमन  
जिस्म जैसे के सूरज कि पेहली किरन  
जिस्म तरशा हुआ दिल -कश ओ दिल -नशीन्                    
संदली संदली , मरमरी मरमरी                    
आफरीन्  आफरीन् , आफरीन्  आफरीन् 
 
         नंतर हळूहळू कळालं कि हि 'लिजा रे'. आणि त्या काळापासून तिची जी छबी मनावर कोरली 
गेली ती अजूनही तशीच आहे. बहुधा बरेचजण या मताशी सहमत असतीलच किंवा अजिबातच असणार 
नाही. तो मुद्दा निराळा. पण देहाचे इतके सुंदर वर्णन करणारे दुसरे एखादे गाणे निदान आता तरी मला 
आठवत नाही.
 
        अलीकडेच असंच कुठे तरी वाचनात आलं कि लिजा रे हि सध्या कधीही बऱ्या न होणाऱ्या एका 
दुर्धर अशा कॅन्सरशी झगडत आहे. वाचून फार मोठा धक्काच बसला. वास्तविक आपला आणि तिचा 
दूरदूर संबध नाही आणि कधी येण्याचाही प्रश्न नाही. तरीही धक्का बसलाच. पुढे त्या बातमीत अजूनही 
थोडंफार लिहिलेलं होत. तिचा आजार निदान झाल्यावरचा कठीण काळ , उपचार, त्याच्या वेदना, कुरूप 
झाल्याचे दुःख , पूर्णतः गळालेले केस..
तिचा असा चेहरा प्रयत्न करूनही समोर येईनाच. 
 
         खरंच कसं वाटलं असेल तिला? एकेकाळी इतके सुंदर जोपासलेले शरीर ,त्यासाठी घ्यावे 
लागलेले कष्ट , सुंदर राहण्यासाठी केलेला आटापिटा , सौंदर्याचे सगळीकडे होणारे कौतुक...हे सगळं 
तिला नक्कीच आठवलं असेल. आणि आता..क्षणाक्षणाला विद्रूप करत मारणारा आजार , अश्या वेळी 
दूर जाणारे - संबध टाळणारे लोक , ज्या दुनियेत अधिराज्य गाजवलं तिथे आता बंद झालेले दरवाजे. 
अवघड आहे. क्षणाक्षणाला आपणही मारत आहोतच पण सुख-दुःखाच्या , काम - क्रोधाच्या , राग - 
लोभाच्या द्वंद्वात आपण इतके खोलवर पूर्णपणे अडकलो असतो कि असा कुठलाही क्षण येईपर्यंत आपण 
सुद्धा मरणार हा विचारच कधी मनात येत नाही. आपणही मरणारच आहोत हे कळायला अश्या क्षणांची 
वाट का पहावी लागते? लिजा रे तरुणपणीच मरणार म्हणून मीही हळहळ व्यक्त करणार आणि तीही 
अशा थाटात कि जणू मी अमरच आहे.

        आपल्याला जर काही चांगली गोष्ट मिळाली तर आपण कधीच म्हणणार नाही कि फक्त मलाच 
का मिळाली. दोन वेळच्या अन्नासाठी लोक महाग असताना मला इतका भरपूर पैसा का दिलास ? 
बेरोजगार होऊनही लोक भटकत असताना मलाच नोकरी का दिलीस ? असं हे यश, सुख मिळालंच तर 
ते मीच मिळवलेलं आहे , माझ्या कष्टानेच मिळवलेलं आहे असा समज नकळतच होत जातो. आणि 
अशी काही अडचण समोर उभी राहिली कि मग मात्र आपण विचारतो...रडतो.. हा आजार मलाच का 
दिलास ? माझी काहीच चूक नसताना अपघात होऊन मीच अपंग का झालो ? साखळी सुरुच राहते.

        सहजच उत्सुकता म्हणून youtube वर लिजा रेच्या  कॅन्सर निदान झाल्यानंतरच्या क्लिप्स 
शोधल्या. पूर्ण टक्कल आणि आता थोडे थोडे उगवलेले केस अशा स्थितीतही ती फार सुंदर दिसत होती.
 तिच्या चेहऱ्यावर तेच हसणं दिसलं आणि वाटलं आपण उगीचच बाऊ करतो मृत्यूचा आणि त्याच्या 
परिणामांचा. शेवटी येणारा जाणारच आणि मागे काहीच उरणार नाही. मुळात हि योजनाच अशी आहे. 
त्यामुळे आपणही असंच चेहऱ्यावर स्मित ठेवून प्रवास करायला हवा. तुमच्या आमच्यासारखीच देहा 
मांसाची काही माणसे कर्मयोग, भक्तियोग , ज्ञानयोग अंगी भिनवत जगली..आणि त्यामुळेच येणाऱ्या 
सुखात आणि दुःखात तशीच समबुद्धी कायम ठेवू शकली. म्हणूनच या सर्वांना संत म्हणले जाते आणि 
त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवण्यासाठी आपल्याला पदोपदी प्रवृत्त केले जाते. 
 
         शेवटी आपले मार्ग जरी अनेक असले आणि आपल्या गाड्या जरी वेगवेगळ्या वेगात जात 
असल्या तरी आपल्या सर्वांचा प्रवास एकाच निश्चित ठिकाणी चालला आहे...एकाच निश्चित ठिकाणी 
संपणार आहे. कुणाचा आधी ..कुणाचा नंतर. याकडे दुर्लक्ष करून आहे तसच जगत जाणं फारच सोप्पं 
आहे ..पण मान्य करून जगण्याचा चांगला प्रयत्न करत जाणं फारच अवघड आहे. 
 
मग ??? प्रयत्न करून बघायचा ना !!!    

~योगेश

No comments:

Post a Comment